आजकाल सतत मोबाईल घेऊन बसलेली मुले आपण ठिकठिकाणी पाहतच असाल. माहितीचे आदानप्रदान करणारे यंत्र म्हणून आपण सर्वजण मोबाईलकडे पाहत असतो. आज सर्व प्रकारची माहिती स्मार्टफोनवर मिळत असल्यामुळे आपण सर्वजण त्याचा नक्कीच वापर करत असाल.
लॉकडाऊनमुळे सर्वजण घरातच अडकून पडले होते, त्यामुळे लहान मुलांना काहीतरी विरंगुळा म्हणून पालकही त्यांना स्मार्टफोन देऊन टाकत होते. परंतु पुढे याची सवयच लहान मुलांना जडलेली आपल्याला दिसून आलेच असेल.
स्मार्टफोनचा योग्य प्रमाणातील वापर हा काही वाईट नाही. कोरोनाच्या समस्येमुळे बंद झालेल्या शाळांना तर या स्मार्टफोनमुळे जीवदानच मिळाले असे म्हटले तरी ते वावगे ठरणार नाही. कारण प्रत्येक मुलगा या स्मार्टफोनच्या मदतीने ऑनलाईन तासिका, ऑनलाईन परीक्षा देऊन लॉकडाऊन असला तरी घरून अभ्यास करू लागला आहे.
Table of Contents
पूर्वी इंटरनेटचा वापर करावयाचा असेल तर तो सायबर कॅफे, ऑनलाईन सेवा देणारी दुकाने यांच्यापर्यंतच मर्यादित होता. आता डिजिटल क्रांतीमुळे प्रत्येकाच्या हातात इंटरनेट पोहचले आहे. मोबाईलचा योग्य प्रमाणातील वापर चांगला असला तरी त्याच्या अतिवापराने मोठ्या गंभीर समस्या उद्भवू शकतात.
आजच्या या लेखात आपण जाणून घेणार आहोत, कि स्मार्टफोनच्या अतिवापराने मुलांमध्ये कोणत्या समस्या उद्भवतात.
कल्पनाशक्तीवर नकारात्मक परिणाम
मोबाईल व टीव्हीच्या अतिवापराने मुलांच्या कल्पनाशक्तीवर अतिशय वाईट परिमाण होतो. लहान मुले हि खूपच चंचल स्वभावाची असतात. त्यांच्या मनात नेहमी काही ना काही चालत असणाऱ्या कल्पनाविलासात ते रमून जात असतात. त्यांच्या मानसिक व बौद्धिक वाढीसाठी कल्पनाशक्तीचा विस्तार महत्वपूर्ण भूमिका अदा करत असतो. ज्यावेळी ते मोबाईलचा वापर करतात, त्यावेळी ते फक्त आणि फक्त मोबाईलचाच विचार करतात. त्यामुळे त्यांच्या कल्पनाशक्तीवर याचा वाईट परिणाम होतो.
स्मार्टफोनच्या अतिवापराने मुलांमध्ये शिकण्याची प्रवृत्तीच कमी कमी होत जाते. त्यांच्यात कल्पनाशक्ती, कल्पकता यांचा अभाव निर्माण होतो.
मानसिक रोग
मोबाईलच्या अतिवापराने मानसिक दृष्ट्या मुलांमध्ये नैराश्य, चिंताग्रस्त, लक्ष केंद्रित न होणे, वागणुकीमध्ये बदल या समस्या सुरु होतात. कधी कधी मुले अतिशय क्षुल्लक कारणावरूनही मोठे पाउल उचलतात. यामागे त्यांची ढासळत चाललेली मनस्थिती कारणीभूत असते. मोबाईलचा अतिवापर मुलांमध्ये मानसिक रोग पैदा करतो.
विविध शारीरिक समस्या
मोबाईलच्या अतिवापराने मुलांना पाठदुखी, मान, खांदेदुखी या समस्यांना तोंड त्यावे लागते. तसेच त्यांच्या डोळ्यावरही मोबाईलच्या अतिवापराचा वाईट परिणाम होतो. मुलांना लहान वयातच चष्मा लागण्याच्या घटनांमध्ये अलीकडील काळात वाढ झालेली आपल्याला दिसून येत असेल.
जास्तीत जास्त वेळ मोबाईल आणि इंटरनेट व गेम खेळवण्यात घालवल्यामुळे बहुतेक मुले हि रक्तदाबाच्या व लठ्ठपणाच्या समस्येला बळी पडत आहेत. त्यांच्या शरीराची अजिबातच हालचाल होत नाही. याचा नकारात्मक परिणाम त्यांच्या शरीरावर होतो. मुले आता मैदानी खेळांपेक्षा मोबाईलवरील खेळाला जास्तीचे प्राधान्य देत आहेत. त्यामुळे त्यांच्या शरीराची हालचाल होत नाही. त्यामुळे ते लठ्ठपणा, तसेच विविध आजारांना बळी पडत असल्याचे आपण पाहतच असाल.
हिंसक स्वभाव
बहुतेक वेळेस मोबाईलमधील सोशल मिडीयाच्या माध्यमातून आपल्याला अनेक प्रकारच्या हिंसक गोष्टी पाहण्यास मिळतात. त्यामुळे मुलांमध्ये हिंसक स्वभाव वाढलेला आपणास पाहण्यास मिळतो. स्मार्टफोनचे व्यसनच लागल्यामुळे तो न मिळाल्यास ते जास्तच हिंसक बनतात. त्यांच्यात हट्टीपणा, आक्रमकता वाढत जाते. जोरजोरात रडणे, घरात आदळआपट करणे हे तर नित्याचेच होऊन बसते.
बुद्धीवर नकारात्मक परिणाम
मोबाईलच्या सतत वापरामुळे मुले मन एकाग्र करू शकत नाही. त्यांच्या लक्ष केंद्रित करण्याच्या क्षमतेवर मोबाईलच्या अतिवापराचा नकारात्मक परिणाम होतो. त्यामुळे अगदी दैनंदिन जीवनातील छोट्या छोट्या गोष्टी त्यांच्या लक्षात राहत नाही.अशाप्रकारे मोबाईलचा अतिवापर मुलांच्या बुद्धीवर नकारात्मक परिणाम करतो.
अपुरी निद्रा
सततच्या मोबाईल वापराने मुलांमध्ये निद्रानाश सारखी समस्या आपल्याला पाहण्यास मिळते. मोबाईलमधील प्रकाश सतत डोळ्यावर पडल्यामुळे मुलांना झोप येत नाही. अपुऱ्या निद्रेमुळे अनेक आजारांना आमंत्रण मिळते.
कुटुंबियांशी संवादाची कमी
स्मार्टफोनच्या अतिवापरामुळे मुलांचा कुटुंबियांशी भावनिक संवादच कमी झालेला आपण पाहतच असाल. त्यामुळे ते त्यांना येत असलेल्या समस्या पालकांना उघडपणे बोलून दाखवत नाहीत. ते यामुळे खचून जातात. तसेच कधी कधी ते अति हिंसक रूपदेखील धारण करतात. ते पालकांनाच आपला शत्रू मानायला लागतात. त्यामुळे या गोष्टी टाळण्यासाठी पालकांनीच त्यांच्याकडून मोबाईल काढून घेऊन त्यांच्याबरोबर एखादा खेळ खेळणे, गप्पा मारल्या तर त्यांच्या मनावरचे ओझेदेखील कमी होईल.
तर मित्रांनो हे होते काही दुष्परिणाम स्मार्टफोनच्या अतिवापराचे. आपल्या सर्वांना हे माहितच असेल कि कुठल्याही गोष्टीचा प्रमाणात वापर हा चांगला असतो, मात्र जर त्याचा अतिरेक झाला तर ती आपल्यासाठी मोठी डोकेदुखी होऊन बसते. आपल्या मुलांचे जास्तीचे मोबाईल व्यसन हि देखील आपल्यासाठी मोठी समस्याच होऊन बसली आहे. त्याचा मुलांना व त्यांच्या आरोग्याला मोठा धोका आहे. ते धोके कोणते आहेत? ते आपण वर बघितलेच आहे. आपले हे कर्त्यव्य आहे कि, त्यांना या मोबाईलच्या व्यसनापासून परावृत्त करणे…
जर हि माहिती आपल्याला आवडली असेल तर ती आपल्या मित्र-मैत्रिणी, नातेवाईक यांना अवश्य शेअर करा. जेणेकरून त्यांनादेखील मोबाईलच्या अतिवापराने मुलांवर काय दुष्परिणाम होतात, याविषयी माहिती कळेल.
अशाच प्रकारच्या माहितीसाठी वेळोवेळी आमच्या www.Netmarathi.com या वेबसाईटला अवश्य भेट द्या.